पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात असून राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करताना आपणाला दिसत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बारामतीची जागा आपल्या हातातून जाते कि काय अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सतावत आहे. या भीतीपोटीच पवार ईव्हीएम मशीनबद्दल बोलू लागलेत असा टोला रिपाई चे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. आठवले यांनी सोमवारी रात्री उशिरा सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील चारा छावणीला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर थोड्या मतांनी हरले होते. ती लोकसभा त्यांनी कपबशीऐवजी कमळावर लढवली असती तर १५ ते २० हजार मतांनी निवडून आले असते, असेही आठवले म्हणाले.
जर एखाद्या मशीनमध्ये घडय़ाळाला दिलेले मत कमळाला जात असेल असे पवार साहेब सांगतात मग दुसऱ्या एखाद्या ठिकाणी मशीनमध्ये कमळाला दिलेले मत घडय़ाळाला जात असेल अशा शब्दांत आठवले यांनी पवारांना टोला लगावला.