बहुजननामा ऑनलाइन – सुशांत सिंग रजपूत मृत्यूचा तपास करणाऱ्यासाठी मुंबईत गेलेल्या बिहार पोलिसांच्या गटावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या बांद्रा पोलिस स्थानकात बिहार पोलिसांच्या विरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी आक्षेप व्यक्त केला. पांडेय यांनी म्हंटलं आहे की, “मुंबई पोलिसांच्या या कारवाईकडे पूर्ण देश पाहतोय की, हे किती घृणास्पद काम आहे . आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आम्ही प्रतीक्षा करतोय.”
पांडेय म्हणाले की, “पहिल्या चार दिवसात आम्ही तपासात खूप पुढे गेलो होतो. पण मुंबई पोलिसांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. वरीष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी चिठ्ठी ही लिहिण्यात आली. पण उलटपक्षी येथून तपासासाठी गेलेल्या एसपी यांना क्वारंटाईन करण्यात आले. या सगळ्या गोष्टी देशातली लोकं पाहत आहेत की, मुंबई पोलिस काय करत आहे.
महाराष्ट्र करनी सेनेकडून बांद्रा पोलिस स्थानकात पटन्याहून मुंबईत गेलेल्या तपास गटाचे सदस्य इन्स्पेक्टर कैसर यासीन, मनोरंजन भारती, सब इन्स्पेक्टर निशांत आणि दुर्गेश यांच्या विरूद्ध तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीमध्ये आरोप करण्यात आले की, पटना पोलिसांना मुंबईत तपास करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. तक्रारीत म्हंटले आहे की, झीरो एफ आय आर नोंदवून मुंबई पोलिसांकडे प्रकरण हस्तांतरीत करायला पाहिजे होते. परंतु असं न करता पटना पोलिसांचे अधिकारी मुंबईत येऊन तपास करू लागले.
पनवेल स्थित तक्रारदार अजयसिंह डोंगर यांनी आरोप लावला की त्यांनी मुंबई पोलिसांच्या कामात अडथळा आणला. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केली. यासाठी डोंगर यांनी पटना पोलिसांच्या तपास गटाविरूद्ध तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली.
यानंतर बिहार पोलिसांकडूनही मुंबई पोलिसांच्या या कारवाईविरूद्ध तक्रार दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.