पाटणा : वृत्तसंस्था – नितीश कुमार यांच्या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी निगडीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश देणारे पत्र बिहार पोलिसांच्या विशेष शाखेने जारी केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. २८ मे रोजीच हे पत्र जारी करण्यात आले होते. त्यात संघ परीवाराशी निगडीत असलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते, दुरध्वनी क्रमांक, आणि व्यवसाय यांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप आघाडीचे सरकार आहे. तरीही हे पाऊल उचलण्यात आल्याने भाजपकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष गृह खातं नितीश कुमारांकडेच आहे.
या पत्रात राज्यातील आरएसएसचे तथा आरएसएसशी निगडीत १७ संस्थांचे पदाधिकारी त्यांची नावे, पत्ते, आणि इतर माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत.
या संघटनांची नावे
आसएसएस, वीएचपी, बजरंग दल, हिंदू जनजागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, धर्म जागरण समिती, राष्ट्रीय सेविका समिती, दुर्गा वाहिनी, स्वदेशी जागरण मंच, शिखा भारती, भारतीय किसान संघ, हिंदू महासभा, हिंदू युवा वाहिनी, यासह एकूण १९ संघटनांचा समावेश या यादीत आहे.
२८ मे रोजी देण्यात आलेल्या आदेशात ही माहिती संकलित करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. त्याची एक प्रत बिहार पोलिसांच्या विशेष शाखेचे एडीजी, आयजी, डिआयजी यांना देण्यात आली होती.