बहुजननामा ऑनलाईन टीम – सुरेश रैना आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्जला सोडून भारतात परतला आहे. तो परतल्यानंतर विविध अंदाज वर्तवले जात होते, परंतु चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या परतण्याचे कौटुंबिक कारण असल्याचे सांगितले होते. पण टीमचे मालक एन श्रीनिवासन यांनी काही वेगळेच कारण सांगितले, आणि जाहीर नाराजी व्यक्त करत रैनाचे आर्थिक नुकसान होईल, असा इशारा सुद्धा दिला आहे.
याच दरम्यान, रैनाने मंगळवारी ट्विट करत पंजाब पोलिसांना आवाहन केले आहे. त्याने म्हटले की, पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत जे झाले , ते खुप भयंकरपेक्षा वाईट होते. माझ्या काकांचा त्याचवेळी मृत्यू झाला होता. माझी आत्त्या आणि आत्तेभाऊ गंभीर जखमी होते. दुर्दैवाने जगण्याची झंज अपयशी ठरल्याने माझ्या भावाने काल रात्री या जगाचा निरोप घेतला. माझी आत्त्या अजूनही खुप गंभीर स्थितीत आहे आणि ती व्हेंटिलेटरवर आहे.
रैनाने म्हटले की, अजूनपर्यंत आम्हाला समजले नाही की, त्या रात्री काय झाले होते. मी पंजाब पोलिसांना आवाहन करतो की, त्यांनी या प्रकरणाकडे पहावे. आम्हाला किमान हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की, त्यांच्यासोबत हे कुणी केले. त्या गुन्हेगारांना आणखी गुन्हे करण्यासाठी सोडले जाऊ नये.
19 ऑगस्टच्या रात्री पठानकोटच्या थरियाल गावात मध्यरात्री हल्ला झाला होता. रैनाच्या आत्याचे सर्व कुटुंब आपल्या घराच्या टेरेसवर झोपले होते. तेव्हा अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला केला.
या हल्ल्यात सुरेश रैनाची आत्या आशा देवी गंभीर जखमी झाली आहे आणि ती हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी लढत आहे, तर आशा देवी यांचे पती 58 वर्षीय अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. रैनाचा आत्तेभाऊ 32 वर्षीय कौशल कुमार आणि 24 वर्षांचा अपिन कुमार यांना गंभीर दुखापत झाली होती.
15 ऑगस्टला इंटरनॅशनल क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर रैनाचे सर्व लक्ष आयपीएलवर होते. तो मैदानावर उतरण्यासाठी उतावीळ असल्याचे दिसत होते. परंतु, अचानक तो आयपीएलमधून बाहेर पडल्याने एमएस धोनीच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.