अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असल्याने अशा वेगवेगळ्या विचारधाराच एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही, असे म्हटले जाते. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले असून काँग्रेस-राष्ट्रवादी हे लोकांचा विचार करणारे पक्ष असून त्यांच्यासोबत काम करणे सोपे असल्याचे सांगितले आहे.
संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतर्फे आयोजित मेधा-२०२० या युवा सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्यासह रोहित पवार, अदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख आणि झिशान सिद्दीकी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत गुप्ते यांनी केले होते. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांना मित्रपक्षांशी अशीच मैत्री ठेवणार काय, असा प्रश्न केला. तेव्हा “आम्ही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत. मित्र काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. विलासराव देशमुखांनी कधीही ‘ग्रेस’ सोडली नाही. आम्ही विरोधात असतानाही त्यांच्यासोबतच आहोत, असे वाटायचे. याशिवाय शरद पवार साहेब आणि माझे आजोबा यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीत वेगळंच प्रेम होतं. आता आमचंही वेगळं नातं निर्माण झालं आहे,” असे आदित्य म्हणाले.
तसेच मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल बोलताना मी राहुल गांधी यांना भेटलो असून त्यांच्यासोबत बोलणे झाले आहे. विचार वेगळे असतील, पण विकास हे ध्येय समान आहे, असे आदित्य म्हणाले.