बहुजननामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टीव्हीवरील टीआरपी स्कॅमचा पर्दाफाश केला होता. यामुळं टेलिव्हिजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. वृत्तवाहिन्यांमध्ये टीआरपी स्कॅमचा हा घोटाळा समोर आला होता. त्यावेळी अनेक कंपन्यांनी टीव्हीवर जाहिरात न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पार्ले जी या बिस्कीट तयार करणाऱ्या कंपनीने देखील यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पारले जी बिस्कीटाची टीव्हीवरुन जाहिरात केली जाणार नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचे नाव टीआरपी स्कॅममध्ये आले होते. त्यानंतर अनेकांनी य वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला होता.
पार्ले जी या कंपनीने हा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविषयी माहिती देताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले की, सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारीत करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. त्यामुळं वृत्तवाहिन्यांना आणि इतर मनोरंजनपर वाहिन्यांना आपला कंटेन्ट बदलण्याची गरज असल्याचा संदेश देखील जाईल. सामाजिक स्वास्थ आणि सलोखा बिघडवणाऱ्या या वाहिन्यांवर पैसा खर्च करण्याची कंपनीची थोडीही इच्छा नाही. त्यानंतर आता पार्ले जी कंपनीनं हा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
पार्ले कंपनीने हा निर्णय घेण्याअगोदर बजाज कंपनीने देखील या तीन वृत्तवाहिन्यांना जाहिरात न देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं पारले व बजाज प्रमाणेच देशातील इतरही कंपन्यानी असा निर्णय घ्यायला पाहिजे, असेही सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.दरम्यान, यापूर्वी उद्योगपती आणि बजाज कंपनीचे संचालक राजीव बजाज यांनी तीन न्यूज चॅनेल्संना बॅन केलं आहे. समाजात विष कालवणाऱ्या, तेढ निर्माण करणाऱ्या कोणासोबतही आम्ही व्यवहार करु इच्छित नाही. बजाज एक विश्वासपूर्ण ब्रँड असून आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो, असे हा निर्णय घेताना राजीव बजाज यांनी म्हटलं होतं.