बहुजननामा ऑनलाईन – परमबीर सिंग हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस अधिकारी अनुप डांगे यांना त्रास दिला असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर सडकून टीका केली.
‘परमबीर सिंग नावाचं हे जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे’
विनायक राऊत म्हणाले, परमबीर सिंग नावाचं हे जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात अनुप डांगे हे पोलीस अधिकारी होते. त्या अनुप डांगेंनी 2 फेब्रुवारी रोजी अॅडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट महाराष्ट्र यांना एक पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंग यांनी भरत शाह आणि जितेंद्र चंदरलाल नवलानी या अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांची बाजू घेऊन अनुप डांगे यांना कशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला ही सर्व बाजू त्यांनी त्यांच्या तक्रारीत मांडली आहे.
‘नवलानी अनुप डांगे यांना म्हणतो की, पमरबीर सिंग आणि आमचे घरचे संबंध आहेत’
पुढं बोलताना राऊत म्हणाले, एक पब बंद करायला गेलेल्या अनुप डांगे यांना परमबीर सिंग यांनी रात्री दोन अडीच वाजता फोन केला आणि केस रजिस्टर करू नको असं सांगितलं. तरीही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनुप डांगे यांनी ते जे बेकायदेशीर काम सुरू होतं त्यावर पूर्णपणे कारवाई केली व केस रजिस्टर केली. ही केस रजिस्टर करताना त्यांनी भरत शाह आणि जितेंद्र नवलानी यांची नावंही त्यात नमूद केली. पोलीस डायरी तशी तयार केली आणि त्यामुळं हा नवलानी अनुप डांगे यांना म्हणतो की, पमरबीर सिंग आणि आमचे घरचे संबंध आहेत. आमचे खूप जवळचे संबंध आहेत तुम्ही जर आज आमच्यावर कारवाई केली तर उद्या आम्ही तुम्हाला दाखवू की, परमबीर सिंग आमचे घरचे व्यक्ती आहेत. दुर्दैवानं त्याच परमबीर सिंग यांनी मध्यरात्रीपासून म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशीपर्यंत अनुप डांगे यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांनी जो त्रास दिला त्याची नोंद डांगे यांनी पोलीस डायरीत केली आहे. त्यात परमबीर सिंग यांचा नावानिशी उल्लेख आहे. आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल डांगे यांनी सर्वकाही आपल्या पत्रातून सविस्तर सांगितलं आहे असंही राऊत म्हणाले आहेत.
‘परमबीर सिंग खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचा बोलता पोपट’
विनायक राऊत असंही म्हणाले, मागील 14-15 महिन्यांपासून महाराष्ट्रावर कावळ्यासारखा डोळा ठेवून बसलेल्या भाजपच्या लोकांना, राजकारणातील कपटनीती जी त्यांनी आजपर्यंत केली ती यशस्वी झाली नाही, म्हणून आता परमबीर सिंग यांच्या माध्यमातून बोलतं करण्यात आलं आहे. परमबीर सिंग खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचा बोलता पोपट आहे. त्यामुळं अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे असंही राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.