बहुजननामा ऑनलाईन – सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यातील भेटींवर शंका उपस्थित करत काँग्रेसने काही सवाल केले आहेत. सचिन वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट परमवीर सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंह यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. या गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडीही सिंह यांच्या कार्यालयातीलच आहे असे सांगतानाच या प्रकरणात एनआयए सिंह यांची चौकशी का करत नाही? सिंह यांची अटक टाळली जातेय का ? वाझेंसारखा अधिकारी हे सर्व प्रकरण घडवून आणूच शकत नाही. अंबानी स्फोटक प्रकरण घडण्यापूर्वी वाझेंना नेमक कोण भेटत होते, त्याचा तपास करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सचिन सावंत यांनी वाझे आणि परमवीर सिंह प्रकरणावरून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. रश्मी शुक्ला या फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी पदाचा दुरूपयोग करण्यापर्यंत मजल जाते. त्यांनी आपण माफी मागितल्याची माहिती फडणवीसांना दिली नसेल का? परमवीर सिंह यांच्याकडून दुसरीकडे लक्ष घेऊन जायचे होते का याचे उत्तर यातून मिळते. सबळ पुरावा द्यायचा असेल, तर दोन व्यक्तीच्या संभाषणाची रेकॉर्डिंग द्यायला हवी होती. ती तर दिली नाही. पण ऐकीव माहितीच्या आधारे, निकटवर्तींयांकडून असा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. फडणवीस आणि परमबीर सिंह हे असे सांगत आहेत की, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाझे गृहमंत्री अनिल देशमुखांना भेटले, प्रश्न असा आहे की, 25 तारखेला अंबानीच्या घराजवळ घटना घडली. त्या वेळी वाझे कुणाला भेटत होते. या प्रश्नाच्या उत्तरातच सगळ दडलेलं असल्याचे सावंत म्हणाले.