मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावरून मोठी घोषणा करणार असे वर्तवले जात होते. पण, त्याआधीच त्यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचे वाटप करण्यात आले होते. पण, काही उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले होते. तिकीट न देण्याचा निर्णय हा दिल्लीत नसून महाराष्ट्रातच घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांसह अनेक आमदारांचे तिकीट कापले होते. यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश मेहता या प्रमुख नेते आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या बाबात बोलतांना फडणवीस यांनी हा निर्णय दिल्लीतील नेतृत्वाचा आहे असे सांगितले होते. परंतु फडणवीस यांच्या या बोलण्याला पंकजा मुंडे यांनी खोडून काढले आहे.
गोपीनाथ गडावर काय बोलणार पंकजा मुंडे ?
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आज गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला भाजप आणि मित्र पक्षातील कोणते नेते उपस्थित राहणार ? यावरूनही चर्चा सुरू झाली.
काही दिवसापूर्वी पंकजा यांनी पुढे काय करायचे ? कोणत्या मार्गाने जायचे ? आपली शक्ती काय ? आपण लोकांना काय देऊ शकतो? असे सांगत मावळ्यांनो या, अशी साद त्यांनी सोशल माडियातून घातली होती. तसेच यावेळी पंकजा मुंडे शक्तीप्रदर्शन करतील असे सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असते तर कोणावरही अन्याय झाला नसता, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. नेमका पंकजा मुंडे काय घोषणा करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Visit : bahujannama.com