मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पुढे काय करायचं ? 12 डिसेंबरला ठरवू असे म्हंटले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. गेल्या काही दिवसांत पंकजा यांनी शिवसेनेचे कौतूक करणारे ट्विट केले आहेत. या सर्व घडामोडींमुळे पंकजा मुंडे भाजप सोडणार का ? अशी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की , ‘पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात. कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचं विश्लेषण करत असतो. असं का झालं याबद्दल तो आत्मचिंतन करत असतो. 12 तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक नेते गोपीनाथगडावर येतात. आम्हीही या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करत आहेत असा अर्थ काढणं चुकीचं आहे. ‘
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. पुढे काय करायचं ? कोणत्या मार्गाने जायचं ?, यासंबंधी मी 12 डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तर आज ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले आहे. या गोष्टींमुळे पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का ? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
Visit : bahujannama.com