बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांमध्ये निर्माण झालेल्या पुरपरिस्थीतीमध्ये बाधीतांना केवळ 16 कोटी 48 लाख रूपये निधी सरकारने वितरीत केला आहे. राज्य शासनाने पूर्व विदर्भातील पुरग्रस्त नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
सरकारकडून अतिशय क्लेशदायक पध्दतीने पुरग्रस्तांवर उपकार करत असल्याच्या थाटात पंचनामे केले जात आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये पुरामुळे सर्वाधिक नुकसानाचा सामना नागरिकांना, शेतक-यांना करावा लागला आहे. गोसीखुर्दचे दरवाजे उघडण्यापूर्वी कोणतीही पूर्व सुचना न दिल्यामुळे हे मानव निर्मीत पुराचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थीतीत मोठया प्रमाणावर नुकसान होवूनही केवळ 16 कोटी 48 लाख 25 हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. केवळ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, अद्याप 10 हजार रूपयांची मदत सुध्दा पुरग्रस्तांच्या हाती आलेली नाही. राज्य सरकारच्या माध्यमातुन पुरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले नाही, चारा छावण्या उभारण्यात आल्या नाहीत.असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.