नवी दिल्ली : वृत्तसंस्था– जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर चवताळलेला पाकिस्तान काश्मीर मुद्दा आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत(UNHRC) उपस्थित करणार आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकाराचं सत्र आजपासून सुरू होत आहे. युएनएच आरसीमध्ये भारताला काश्मीर मुद्द्यावरून घेरण्यासाठी पाकिस्तानचा पूर्ण प्रयत्न आहे. भारताने ज्या प्रकारे आपली तयारी केली आहे. त्यावरून असे दिसत आहे की, पाकला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर लाजिरवाणं वाटणार आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी 9 ते 27 सप्टेंबरपर्यंत जिन्हिवामध्ये होणाऱ्या या सत्रात भारताविरुद्ध पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे. हे स्पष्ट आहे की, जर पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर कोणता प्रस्ताव ठेवायचा असेल तर तो 19 सप्टेंबरपूर्वीच ठेवावा लागेल.
जिन्हिवा आणि दिल्लीतील मुत्सद्दी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते पाकिस्तान जगासमोर काश्मीरचा प्रचार करत आहे. काहीही करून काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे, जेणे करून जगासमोर आपले म्हणणे मांडता यावे. परंतु पाकिस्तान मात्र आपल्या योजनांमध्ये मात्र यशस्वी होताना दिसत नाही.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर युएनएचआरसीच्या सर्व 47 सदस्यांना व्यक्तिश: भेटले आहेत. याशिवाय त्या सर्वांना त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांनीही काश्मीरमधील अंतर्गत परिस्थिती सांभाळली आहे.