नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांचे जबरदस्ती धर्मांतर करण्याचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशाच एका प्रकरणात, धर्मांतराचा बळी पडलेल्या महक कुमारी नावाच्या हिंदू मुलीने आपल्या कोर्टाच्या हजेरीदरम्यान स्पष्टपणे सांगितले होते की, तिला तथाकथित नवऱ्या ऐवजी आईवडिलांसोबत घरी परत जायचे आहे. पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गुरुवारी कोर्टामध्ये सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय कागदपत्रांमधूनही हे सिद्ध झाले की महक कुमारी एक अल्पवयीन आहे आणि तिचे वय केवळ १५ ते १६ वर्षे दरम्यान आहे. सुनावणीनंतर कोर्टाने महकला लारकाना येथील निवारा गृहात पाठविण्याचे आदेश दिले व शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला.
महक, तिचा ‘पती’ अली रजा सोलंगी आणि महकचे पालक न्यायालयात हजर झाले. कोर्टाने महक यांना सोलंगी आणि तिच्या पालकांना भेटण्यासाठी पंधरा-पंधरा मिनिटे दिली. माध्यम अहवालात म्हटले आहे की, महकने आपल्या निवेदनात न्यायालयात सांगितले की, आधीच्या निवेदनात तिने जे वक्तव्य केले होते, तिला ते बदलण्याची इच्छा आहे कारण तिने हे वक्तव्य भावुक होत दिले होते. तिला परत तिच्या पालकांकडे जायचे आहे. आधीच्या निवेदनात ती म्हणाली की तिला सोलंगी सोबत राहायचे आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, महकने आपल्या पालकांकडे परत जाण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान एक वैद्यकीय अहवालही सादर करण्यात आला ज्यामध्ये असे म्हटले गेले की महक १५ ते १६ वर्षे वयोगटातील आहे.
महकच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की १५ जानेवारी रोजी त्यांच्या मुलीचे जैकोबाबाद येथून अपहरण करण्यात आले होते. तिचे वडील विजय कुमार यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता आणि म्हटले होते की सोलंगीने आपल्या मुलीचे अपहरण केले आणि तिचासोबत लग्न केले. आपली मुलगी अल्पवयीन असून ती १५ वर्षांची असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कट्टरपंथी मुस्लिम संघटनांकडून त्रास होण्याच्या भीतीने जैकोबाबादमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जमियायत उलामा इस्लाम-फजल या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मुलीने इस्लाम स्वीकारला आहे, तिचे नाव अलिझा आहे आणि आता निर्णय बदलू दिला जाणार नाही आणि तिला तिच्या पालकांकडे परत जाऊ दिले जाणार नाही. या संघटनांकडून कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी पोलिसांनी कोर्टाकडे जाणाऱ्या रस्तावर काटेरी तार लावून रस्ता रोखला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दिसून आली आणि मोठ्या संख्येने लोक वेळेवर कामावर पोहोचू शकले नाहीत. या भारी सुरक्षादरम्यान महक यांना न्यायालयात हजर करण्यात आले.