नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस संसर्गाच्या या संकटात सुद्धा पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या हिताचा विचार करण्याऐवजी शेजारी देशाला दुखापत करण्याचा विचार करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात अपयश आल्यानंतर आता पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय जम्मू-काश्मीरसह भारताच्या विविध भागात हल्ले करण्याचा मास्टर प्लॅन बनवत आहे. आत्मघातकी हल्ल्यांसाठी ओळखली जाणारी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला ही जबाबदारी देण्यात आली आहे.
गुप्तचर एजन्सीने अलर्ट जारी केला आहे की, जैशला जम्मू-काश्मीरसह देशाच्या अन्य भागात मोठ्या प्रमाणात दशहतवादी हल्ले करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार जैशचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ मुफ्ती रौफ असगर आणि जैशचा दहशतवादी शकील अहमदसोबत याच 20 ऑगस्टला रावळपिंडीत आयएसआयच्या अधिकार्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत नव्याने हल्ला करण्याचा कट रचण्यात आला आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून आयएसआय जैश आणि लष्करद्वारे जम्मू-काश्मीरमध्येच फ़ोकस करत होता.
आता नव्या दहशतवादी मास्टर प्लॅनमध्ये काश्मीरसह देशाच्या अन्य भागाला सुद्धा टार्गेट बनवण्याचा कट रचण्यात आला आहे. या मीटिंगमध्ये रौफ असगरचा भाऊ मौलाना अम्मार सुद्धा सहभागी होता. इतकेच नव्हे, इम्रान खान यांच्यापासून हाकेच्या अंतरावर इस्लामाबादमध्ये दहशतवादी संघटनांचे प्रमुख बिनधास्तपणे भारताविरोधात कट रचत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार रौफ असगरने जैशचा मोठा दहशतवादी मुफ्ती अजहर खान काश्मीरी आणि क्वारी जरारसोबत इस्लामाबादच्या एका मरकजमध्ये बैठक घेऊन दहशतवादी हल्ल्याची रूपरेषा तयार केली. पाकिस्तानचा गैरसमज आहे की, लष्कराचे पूर्ण लक्ष काश्मीरकडे आहे. अशावेळी त्याला भारताच्या इतर भागात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु, हा गैरसमज दूर झाला, जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयएसआयएसच्या एका दहशतवाद्याला स्फोटकांसह पकडले होते.