बहुजननामा ऑनलाईन – भारताला आण्विक युद्धाची धमकी देणारा पाकिस्तान आता नरमला आहे. जम्मू कश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य करुन वाटाघाटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी म्हणाले, भारताशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी तयार असून वाटाघाटीसाठी आम्ही तयार आहोत. पाकिस्तानने कधीही चर्चेला नकार दिला नाही. मात्र काही दिवसापुर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारत सरकार जोपर्यंत कश्मीरच्या कमल ३७० वर फेरविचार करत नाही तोपर्यंत भारताशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे सांगितले होते. तर कुरेशी यांनीही कोणत्या तिसऱ्या राष्ट्राने मध्यस्थी केली तर आनंदच असल्याचे म्हटले होते. मात्र भारत सध्या कोणतीही चर्चा करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
तसेच, या विषयात कश्मीर, भारत आणि पाकिस्तान असे तीन पक्षकार आहेत. तसेच कश्मीरमधील नजरकैद नेत्यांना सोडण्यात यावे. त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे. कुरेशी यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानी परराष्ट्र नितीमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. मात्र यापुर्वी त्यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फक्त युद्धाच्याच धमक्या मिळत होत्या. पाकिस्तानने जम्मू कश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याचा केलेला प्रत्येक प्रयत्न फसला. इतकेच काय तर रुस, अमेरिका, फ्रांस सारख्या देशांनीही ही भारत पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले होते.