नवी दिल्ली : वृत्तसंस्था- चांद्रयान 2 मोहिमेतील लँडर विक्रमचा चंद्रापासून 2.1 किमी अंतरावर असताना इस्रोशी संपर्क तुटला होता. यानंतर पाकिस्तानचे विज्ञान मंत्री फवाद चौधरी भारताविरोधात बरळले होते. परंतु पाकिस्तानच्या नमिरा सलीम यांनी भारताच्या अंतराळ मोहिमेचे कौतुक केले आहे. नमिरा सलीम या पाकिस्तानच्या पहिल्या वहिल्या महिला अंतराळवीर आहेत. त्यांनी चांद्रयान 2 साठी इस्रोला शुभेच्छाही दिल्या. हा एक ऐतिहासिक प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.
नमिरा सलीम म्हणाल्या की, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवण्याचा जो ऐतिहासिक प्रयत्न केला त्याबद्दल मी भारत आणि इस्रोचे अभिनंदन करते. चांद्रयान 2 मोहिम ही संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक मोठी झेप आहे. फक्त दक्षिण आशियाच नाही तर संपूर्ण जागतिक अवकाश समुदायासाठी ही अभिमानाची बाब आहे.” एका मासिकाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पुढे नमिरा सलीम म्हणाल्या की, “दक्षिण आशियाची अवकाश क्षेत्रातील प्रगती लक्षनीय आहे. कुठला देश यामध्ये पुढे आहे हे महत्त्वाचे नाही. अवकाशात सर्व राजकीय सीमा संपुष्टात येतात.” नुकतेच समजले आहे की, चंद्रयान 2 चा लँडर विक्रमबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यावरून समजत आहे की विक्रम लँडर सुरक्षित आहे. लँडरची कोणतीही तोडफोड झालेली नाही. इस्रोच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लँडर विक्रमसोबत संपर्क साधण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला जात आहे.