भुवनेश्वर : वृत्तसंस्था – डोंगर फोडून ३ किलोमीटरचा कालवा खणल्याने यावर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या कॅनल मॅनला सध्या रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानेच दैतारी नायक यांना रोजगार मिळण्यास अडथळे येत असल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. रोजगारात पद्मश्री अडथळा ठरत असल्याने हा पुरस्कार परत करायचा असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
कोण आहेत कॅनल मॅन ?
दैतारी नायक हे ओडीशाच्या केनोझार जिल्ह्यातील तालाबैतरणी गावात राहणारे ७५ वर्षीय व्यक्ती. त्यांच्या गावाला बांसपाल, तेलकोई आणि हरिश्चंद्रपूर परिसरातील अनेक गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न होता. पिण्यासाठीच पाणी मिळत नव्हते तर सिंचनासाठी पाणी कोठून येणार. त्यामुळे शेतकऱ्यांना संपुर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे दैतारी नायक यांनी गोनासिका डोंगरातून कुदळ, फावड्याच्या मदतीने तब्बल तीन किलोमीटरचा कालवा खणला होता. त्यामुळे १०० एकर जमीन सिंचनाखाली आली होती. २०१० ते २०१३ या काळात त्यांनी हा कॅनल खणला. त्यामुळे त्यांना कॅनल मॅन म्हणून ओळखलं जातं. तर सरकारने त्यांना याबद्दल यावर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरविले.
पद्मश्रीमुळे रोजगाराला अडचणी
आधी मजूर म्हणून शेतात काम करायचो. मात्र आता मला कोणीही काम देत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने मला काम दिल्यास तो पुरस्काराचा अपमान होईल, असे लोक म्हणतात. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मला पद्मश्री पुरस्काराचा काही उपयोग नाही. अशी तीव्र शब्दात दैतारी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
पद्मश्री मिळाल्यानंतर विकास होईल असे वाटले होते
दैतारी नायक यांनी खोदलेला कॅनल अद्यापही कच्चा आहे. त्याला अजूनही पक्की भिंत मिळाली नाही. तर त्यांच्या गावाचा विकास होईल असे दैतारी व गावकऱ्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर वाटले होते.
मुंग्यांची अंडी खाऊन कुटुंबाचं जगणं
दैतारी यांच्या कुटुंबियांची रोजगार न मिळाल्याने वाईट परिस्थिती झाली आहे. रोजगार नसल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कुटुंबाला मुंग्यांची अंडी खाऊन गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आता हा पद्मश्री पुरस्कार परत करायचा आहे.