अहमदनगर : पब्जीच्या खेळातून आलेल्या नैराश्यातून एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने बंदुकीतून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. राहुल नानासाहेब पवार (वय २८, रा़ टाकळीभान, ता़ श्रीरामपूर) असे या तरुणाचे नाव आहे. पब्जीच्या खेळामुळे अनेक जण एकमेकांच्या जीवावर उठल्याची अनेक प्रकरणाने दिवसेंदिवस पुढे येत आहे. पब्जी खेळू न दिल्याच्या कारणावरुन लहान भावाने मोठ्या भावाचा खुन करण्याचा प्रकार नुकताच घडला होता.
पब्जीच्या खेळाच्या वेडापायी आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या तरुणाने स्वत:ला संपवून घेतल्याने टाकळीभान परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा तरुण आधुनिक पद्धतीने शेती करत होता. शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसायही त्याने सुरु केला होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. असे सर्व काही व्यवस्थित सुरु असताना राहुल याला पब्जी खेळण्याची सवय जडली. या खेळातून त्याला नैराश्याने गाठले. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी राहुलने त्याचे मेव्हुणे बाळासाहेब तुवर यांना मेसेज पाठविला होता. त्यात त्याने म्हटले होते की, मी जीवनाला कंटाळलो आहे. मला जगण्यात रस नाही. माझ्या मृत्युला कोणालाही जबाबदार धरु नये, आईची काळजी घ्या. असे त्यात म्हटले होते. मेव्हुण्यांबरोबरच त्याने गावातील काही मित्रांनाही मला माफ करा़ गुड बाय असे मेसेज टाकले होते. मात्र, हे सर्व मेसेज मध्यरात्री टाकल्याने सकाळपर्यंत ते कोणाच्या पाहण्यात आले नाही. पब्जीच्या खेळाच्या वेडापायी एका होतकरु तरुण अभियंत्याने आपली जीवन यात्रा संपविली आहे.