औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – मराठा क्रांती मोर्चामध्ये लाखोंचा मराठा समाज सहभागी झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ आहे. परंतु काही लोकांनी राजकिय स्वार्थासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचा वापर करून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु जर कोणाला निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी लढवावी परंतु राजकिय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा वापर करू नये. त्याला आमचा विरोध आहे. अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. यावेळी रमेश गायकवाड, मनोज गायके, सतीश वेताळ, आत्माराम शिंदे, नितीन कदम, शिवाजी जगताप, विक्की पाटील, अमोल साळुंके आदी उपस्थित होते.
कोपर्डी येथे मराठा समाजातील भगिनीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर पहिला मूक मोर्चा औरंगाबाद येथे ९ ऑगस्ट २०१६ रोजी निघाला होता. पिडीतेला न्याय मिळावा, मराठा आऱक्षण, शेतीमालाला हमीभाव या मागण्या घेऊन मोर्चा निघाला होता. त्यानतंर ५८ मूक मोर्चे निघाले होते. त्या मोर्चांमुळे सरकारला आपली ताकद आणि शिस्त समजली.असे किशोर चव्हाण म्हणाले.
तर मराठा क्रांती मोर्चा ही समाजातील सर्व सामान्यांची अस्मिता आहे. ही एक चळवळ आहे. सर्व स्तरातील लोकांनी निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन उभी केलेली ही चळवळ आहे. या चळवळीचा वापर राजकिय स्वार्थासाठी काही जण करत आहेत. त्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नाव वापरल्याचे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार असल्याचे मुंबईत काही जणांनी जाहीर केले आहे. राजकिय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा वापर करण्यास आमचा विरोध आहे. असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.