पोलीस भरती परिपत्रक रद्द करण्याची मागणी
उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – शासनाने पोलीस भरती प्रक्रियेबाबत काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १८ जानेवारीला परिपत्रकाद्वारे पोलीस भरतीत मोठा बदल केला आहे. त्यात मैदानी चाचणीच्या आधी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. तसेच मैदानी चाचणीचे १०० वरुन ५० गुण करण्यात आले आहेत.
ऐन पोलीस भरतीच्या वेळी सरकारने हा केलेला बदल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर अन्याय करणार आहे.
त्यामुळे याबाबत काढलेला जी. आर. मागे घेण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी विकास बनसोडे, अर्जुन सलगर, मिलिंद रोकडे, पंकज शिंदे, के. टी. गायकवाड, सुभाष वाघमारे, सुशिल बनसोडे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जाफरभाई शहबाज काझी, रमेश गंगावणे, अक्षय पांडागळे, रवि बनसोडे, विशाल बनसोडे, सुधीर वाघमारे, अमोल जानराव आदींची उपस्थिती होती.