शिर्डी : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिर्डी येथील साईबाबा मंदिर देखील भक्तांसाठी बंदच आहे. मात्र, मंदिर उघडण्याची परवानगी मिळाली तरी त्यासाठी काही नियम भाविकांना पाळावे लागणार आहेत. तसे झाले तर दिवसभरात दर्शन मिळू शकणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट होणार असून अनेक भक्तांना दर्शनाच्या प्रतीक्षेत थांबावे लागणार आहे.
राज्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडण्याची आशाही निर्माण झाली आहे. त्यामुळे शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेही यासाठी तयारी केली आहे. गर्दी टाळून आणि सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. कारण ज्यावेळी मंदिर उघडले जाईल त्यावेळी पूर्वीप्रमाणे गर्दी होणार नाही. नव्या योजनेनुसार शिर्डीत दिवसभरात केवळ 3500 भाविकांना दर्शन होऊ शकणार आहे. इतर वेळी ही संख्या 50 हजार असते. तर सुट्टी आणि उत्सवाच्या काळात हीच संख्या लाखाच्या वर जाते. मात्र, आता तशी मोकळीक देता येणार नाही. त्यामुळे भागिकांची गर्दी इतिहास जमा होण्याची शक्यता अधिक आहे.
नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी संस्थान सज्ज झाले असल्याचे मुख्य कार्यकारी अरुण डोंगरे यांनी दिली. धार्मिक स्थळे सुरु करण्यासंबंधी सरकारने परवानगी दिल्यानंतर घालू दिलेले सर्व नियम पाळून शिर्डीचे मंदीर खुले केले जाणार आहे. दर्शनाची नवी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार तासाला 300 तर दिवसभरात 3500 भाविकांना दर्शन घेता येईल. यासाठी टाईम स्लॉट ठरवून देण्याच्या पद्धतीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.