कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची वल्गना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; परंतु राज्य शासनाने मराठ्यांना एसईबीसी म्हणजे आर्थिक व सामाजिक मागासचे १६ टक्के आरक्षण देऊन ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र रचले आहे. याचा जाब विचारण्यासाठी ओबीसी, भटके विमुक्त संघर्ष समितीच्या वतीने २५ रोजी विधान भवनावर उद्रेक व आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
शासनाने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात २७ जानेवारीपासून राज्यव्यापी जनजागरण रॅलीची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईपर्यंत ओबीसी व भटक्या विमुक्त सर्व समाजांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती; मात्र राज्य शासनाने सर्व ओबीसींची घोर फसवणूकच केली आहे.