बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने अनेक महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल केली आहे. यापूर्वी वाहनानीची आवश्यक कागदपत्रांचे रूपांतर स्मार्ट कार्डात (ration card)केले होते. आता वन नेशन वन रेशन कार्ड योजना आता नव्या वर्षात नव्या रुपात दिसणार आहे.पिवळं, केशरी आणि पांढऱ्या रंगाचं तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डसारखं होणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून जवळपास ८४ कोटी नागरिकांना आता एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात बिहारमधून करण्यात आली आहे.
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ८० कोटीपेक्षा अधिक गरीब लोकांना मोठा दिलासा दिला होता. पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू करण्याचा मुद्दाही उपस्थित केला होता.
केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर हे रेशन कार्ड आता देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत देशातील २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
‘वन नेशन वन रेशन कार्ड’चे फायदे
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवरच धान्य मिळत आहे. या योजनेमुळे आपण ज्या राज्यात किंवा कोणत्याही ठिकाणी असेल तिथे नजीक असणाऱ्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आपण रेशन कार्ड बनवू शकतो. तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इतकच नाही तर तुम्ही स्वत:ही ऑनलाईन अर्ज करु शकता.
कसा मिळवाल योजनेचा लाभ ?
जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करुनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणं गरजेचं आहे. त्यासह काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती तुम्हाला तहसील कार्यालयात अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे.