औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून उभे असलेले उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज शनिवारी बाद ठरल्याने काँग्रेसची नाचक्की झाली आहे. एकेकाळी वर्चस्व असलेल्या औरंगाबाद शहरातून काँग्रेसची हकालपट्टी झाली आहे. याचबरोबर पैठणमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय वाघचौरे, गंगापूर-खुलताबाद मतदार संघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अभिजित धर्माधिकारी यांचेदेखील उमेदवारी अर्ज बाद झाले. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबाद शहर नावाजले जायचे. औरंगाबाद पश्चिम आणि २००९ मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर राजेंद्र दर्डा निवडून आले होते. मात्र २०१४च्या निवडणुकीत राजेंद्र दर्डा यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसची सत्ता हळूहळू निसटू लागली.
त्यानंतर विधानसभा निवडणुकी पूर्वीतरी पक्ष योग्य पाऊले उचलतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु यावर पाणी फेरले. विधानसभा निवडणुकीसाठी शहरात तीन मतदारसंघ आहेत. त्यापैकी आघाडीत झालेल्या जागावाटपाच्या सूत्रांमध्ये काँग्रेसकडे औरंगाबाद पश्चिम हे मतदारसंघ तर मध्य औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला देण्यात आली. तसेच पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला देण्यात आला. पश्चिममधून काँग्रेसने रमेश गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी दिली. शनिवारी झालेल्या छाननीत शपथपत्राच्या एका कॉलममध्ये माहिती न दिल्याने गायकवाड यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. याविरोधात गायकवाड यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे. परंतु त्यानंतर काही काळासाठी तरी शहरातील काँग्रेस हद्दपार झाली आहे. तसेच फुलंब्री आणि सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत.
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात काँगेसची प्रबळ सत्ता होती. एवढेच नव्हे तर जिल्हा बँक, सहकारी संस्था, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बाजार समितीवरदेखील नेहमी काँग्रेसचेच वर्चस्व होते. मात्र आज परिस्थिती वेगळी असून त्यातील बऱ्याचश्या संस्था विरोधी पक्षांच्या ताब्यात गेल्या आहेत. काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल यांनी सांगितले कि, रमेश गायकवाड यांच्या अर्ज वैधतेबाबत आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. तिथे आम्हाला नक्की यश मिळेल. त्यामुळे काँग्रेस हद्दपार झाली आहे, असे म्हणणे चूक ठरेल. विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातून एकूण २०८ उमेदवार पात्र ठरले असून इतर ४० उमेदवार अपात्र ठरले आहे.
Visit : bahujannama.com