बहुजननामा ऑनलाईन टीम – पानमसाला गुटखा बंदी प्रकरणात उच्च न्यायालायाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाला नोटिसा बजावल्या आहेत. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात पानमसाला गुटखा बंदी कडक करण्यासाठी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर खंडपीठाने या नोटिसा बजावल्या आहेत.
पानमसाला गुटखा बंदी व तंबाखूजन्य पदार्थ इत्यादीच्या सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, पोटाचे विकार, त्वचारोग. इत्यादी रोगांची वाढ होत आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा आयुक्त मुंबई यांनी परिपत्राद्वारे राज्यात पानमसाला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ इत्यादी उत्पादन वाहतूक, विक्री, वाटप, सेवन करण्यास प्रतिबंध घातले आहेत. प्रतिबंध असतानादेखील पानमसाला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन वाहतूक, विक्री वाटप, सेवन होत आहे.
कोरोना काळात तंबाखूजन्य पदार्थ इत्यादीच्या सेवनामुळे रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत थुंकण्याचे प्रमाण वाढले. यामुळे कोरोना प्रादुर्भावाला गती मिळण्याची भीती वाढत आहे. पोलीस प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकारी यांना सोबत घेऊन कार्यवाही करत नसल्याने बोगस गुन्हे दाखल होत असून आरोपींना त्यातून सूट मिळत आहे. भ्रष्टाचारास फूस मिळत आहे. याचिकाकर्ते दादासाहेब पवार यांनी ही बाब अन्नसुरक्षा आयुक्त, पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन देखील कोणतीच कारवाई झाली नाही. यामुळे पवार यांनी फौजदारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.