मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्यात महाआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी ज्यांनी तीन मोठ्या पक्षांना एकत्र आणले ते शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आता काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (NCP President Sharad Pawar) करावं यासाठी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात राऊत यांनी लिहिलेल्या दोन लेखात पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावरून काँग्रेसनं नाराजीदेखील व्यक्त केली.
दरम्यान, राऊत यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता खुद्द शरद पवारांनी (NCP President Sharad Pawar)यावर भाष्य केलं आहे. ‘यूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,’ असं न्यूज१८ इंडिया’ या वृत्तवाहिनीशी बोलत पवार म्हणाले.
ही विरोधी पक्षाचीच दुर्दशा, संजय राऊतांचा काँग्रेसवर बाण
यूपीएचं नेतृत्त्व कमकुवत झालं आहे. सत्ताधाऱ्यांना तोंड देताना विरोधी पक्षांमध्ये एकजूट दिसत नाही. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए एक राजकीय आघाडी आहे. मात्र आता तिची अवस्था एका एनजीओसारखी झाली आहे. काँग्रेसला वर्षभराहून अधिक काळ पूर्ण अध्यक्ष नाही, अशा शब्दांत राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या अवस्थेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राऊत यांनी काँग्रेसवर टीका करताना शरद पवारांचं मात्र कौतुक केलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा अपवाद वगळता यूपीएमधील अन्य सहकारी पक्षांमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. काँग्रेसचं नेतृत्त्व कोण करणार? यूपीएचं भविष्य काय? असे प्रश्न कायम आहेत,’ असं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं. राहुल गांधी संघर्ष करणारे नेते आहेत. पण त्यांना आवश्यक असलेली साथ मिळत नाही, असंदेखील राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.