बहुजननामा ऑनलाईन – पुढील आदेश येईलपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरामधील जीम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव आणि शाळा आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “शाळा हा महत्त्वाचा विषय आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आपल्या इथे कुठेही कोरोना व्हायरसची उत्पत्ती झालेली नाही. तरीही जनतेत एक भीती आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांव्यतिरीक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील शाळा सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबईत अद्याप तसं केलेलं नाही. जास्त भीती पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी स्वत:हून खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिथे गरज आहे तिथे त्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “जनतेला एक विनंती आहे की, अनावश्यक प्रवास करणं जनतेनं टाळावं. रेल्वे आणि बस सेवा अत्यावश्यक सेवा असल्यानं त्या बंद करता येत नाही. जनतेला विनंती आहे की, त्यांनीही गर्दी टाळावी. मॉल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी जाणं टाळावं.”