बहुजननामा ऑनलाइन टीम – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ( Bihar assembly elections) एनडीएला (NDA) बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या असतानाही, नितीश कुमारांनी(Nitish Kumar ) मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. मात्र, भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढली असून, सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री (chief minister four times) होण्यासाठी तयार केले आहे. नितीश कुमार हे निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नाराज आहेत.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,नितीश कुमार(Nitish Kumar ) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे दर्शवल्यानंतर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास राजी केले आहे. एवढेच नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे सरकार चालवू शकतात, असे आश्वासनही भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांना दिले आहे. दरम्यान, नितीश कुमार बुधवारी एक ट्विट करून म्हणाले, जनता सर्वोपरी आहे. एनडीएला बहुमत दिल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही मी सातत्याने समर्थनासाठी आभार मानतो.
– चिराग पासवान यांनी बिघडवले जदयुचे गणित
चिराग पासवानांनी आणि त्यांच्या लोजपाने जदयू आणि नितीश कुमारांना चांगलेच काळजीत टाकले होते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, नितीशकुमार हे अत्यंत तणावात होते, की चिरागने किमान 25 ते 30 जागांवर जदयूच्या विजयाची शक्यता बिघडवली. आम्ही त्यांना मुख्यमंत्री राहण्यासाठी राजी केले आहे. मात्र, आता भाजप आघाडीतील मोठा भागिदार आहे. 243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत. यात भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत.
– 2005 नंतरची सर्वात वाईट कामगिरी
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जदयूला 43 जागा मिळाल्या आहेत. 2005 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही पक्षाची सर्वात वाईट कामगिरी आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 71 जागांवर विजय मिळवला होता.
– वरिष्ठ भाजप नेत्यांनी घेतली नितीश कुमारांची भेट
बिहारमधील वरिष्ठ भाजप प्रभारी भूपेंद्र यादव, बिहार भाजप अध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी सायंकाळी नीतीश कुमार यांची भेट घेतली.