नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मोदी सरकारचे एक मंत्रालय 16 कोटी लोकांना रोजगार देणार आहे. मोदी सरकारचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई) क्षेत्र येत्या काही वर्षांत एक प्रमुख रोजगार क्षेत्र म्हणून उदयास येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एमएसएमई मंत्रालय सांभाळत आहेत. येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात पाच कोटी नवीन रोजगार उपलब्ध होतील, असा त्यांचा दावा आहे.
या रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातही उपलब्ध होतील. याशिवाय अलीकडेच एमएसएमई क्षेत्राने 11 कोटी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशाप्रकारे, 2025 पर्यंत 16 कोटी लोकांना नवीन रोजगारांशी जोडण्यात हे मंत्रालय यशस्वी होईल.
याबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की ,पंतप्रधान मोदी पुढील पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत नेण्याचा दिशेने काम करीत आहेत. यात एमएसएमई क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
सध्या, देशातील जीडीपीमध्ये एमएसएमई क्षेत्र 29 टक्के आहे.सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान जीडीपीच्या २ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर वाढवण्याची एमएसएमई मंत्रालयाची इच्छा आहे.