नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब असे सारखे म्हणले जाते. सरकारी कर्मचारी म्हटलं की कामात दिरंगाई होणारच. असे आपण अनेकदा म्हणत असतो. काही जणांनी तर याचा अनुभवदेखील घेतला असेल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी चांगलंच फैलावर घेतले आहे. एमएसएमई विभागाच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांना त्याचा अनुभव आला. त्यामुळे नाराज झालेल्या गडकरींनी त्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली.
बुधवारी एमएसएमई विभागाच्या तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांनीदेखील उपस्थिती लावली होती. अधिकाऱ्यांच्या कामाची शैली पाहून नाराज झालेल्या गडकरींनी त्यांना त्यांच्या पगाराची आठवण करून दिली. यावेळी गडकरींनी अधिकाऱ्यांना गाय-म्हशीचं उदाहरणसुद्धा दिले. ‘आपण गायी-म्हशी पाळतो. त्यांनी जास्त दूध द्यावं यासाठी त्यांना चांगला आहार देतो. पण चांगला आहार खायला घालूनसुद्धा दूधच मिळत नसेल, तर मग अशा जनावरांचा काय उपयोग?,’ असा सवालदेखील गडकरींनी उपस्थित केला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे संतापलेल्या गडकरींनी, ‘सरकारनं तुम्हाला फुकट पगार द्यायचा का? इतक्या अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर गुंतवणूक करण्याची गरजच काय?,’ असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केले आहेत. या अगोदरसुद्धा नितीन गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैली आणि कार्यक्षमतेवर संताप व्यक्त केला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनएचएआयच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये गडकरींनी संताप व्यक्त केला होता. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी-१ सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या इमारतीचं काम भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी-२ सरकारच्या काळात पूर्ण झाले. त्यावर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो अशा कार्यालयांमध्ये लावायला हवेत, असे नितीन गडकरी म्हटले होते.