नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह अर्थात पुनर्विचार याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निर्भयावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांच्या फाशीची तारीख ठरली आहे. 22 जानेवारीला सकाळी सात वाजता तिहार तुरूंगात या चौघांना फासावर लटकवले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने दिला. दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षय विरोधात डेथ वॉरंट बजावले आहेत.
2012 Delhi gang rape case: Supreme Court dismisses curative petitions of two convicts – Vinay Kumar Sharma and Mukesh Singh. pic.twitter.com/9Nsh1AZMaU
— ANI (@ANI) January 14, 2020
पतियाला हाऊस कोर्टाने दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती एन.व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, आर.एफ. नरीमन, आर. भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठानं एकमतानं दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.
निर्भयाचा गुन्हेगार विनय याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत समाजिक-आर्थिक परिस्थिती, त्याचे आजारी असलेले आई-वडील आणि कुटुंबातील अवलंबून असेलेल्या व्यक्ती, तुरुंगातील चांगले वर्तन आणि त्यात सुधारण्याची शक्यता आदींचा विचार केला गेला नाही आणि त्यामुळे न्याय झाला नाही, असे म्हटलं होते.