नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात चारही आरोपी फाशी टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशातच या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक आरोपी विनय शर्मा याने १६ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगातील भींतीवर डोके आपटून स्वात:ला दुखापत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही बाब सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळीच भिंतीवर डोके आपटणाऱ्या विनयला आडवले भिंतीवर डोकं आपटताना विनयच्या डोक्याला जखम झाली मात्र ही किरकोळ जखम असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे या घटनेनंतर इतर सर्व दोषींच्या सुरक्षेबाबत तिहार तुरुंग प्रशासन सतर्क झाला आहे..
दोषींकडे दिले जातेय विशेष लक्ष
ज्या सेलमध्ये निर्भया प्रकरणातील दोषींना ठेवण्यात आले आहे, तेथील आसपास वातावरण सामान्य राखण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आक्रमक झालेल्या दोषींना शांत करण्यासाठी त्यांचे सतत समुपदेशनही करण्यात येत आहे. वेळोवेळी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात आहे. असे केल्याने या सर्व दोषींची मानसिक स्थिती सामान्य राहील असे प्रशासनाला वाटत आहे. दररोज या सर्वांची आरोग्य तपासणीही केली जात आहे. विनयने आपल्या सेलमध्ये भिंतीवर डोके आपटल्यानंतर आता अन्य दोषी अक्षय, पवन आणि मुकेश यांच्यावरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या सर्व दोषींच्या सेलसमोर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत.
फाशीपूर्वी दोषींचे आरोग्य सामान्य असणे महत्वाचे
तुरुंग मॅन्युअलनुसार, फाशीवर चढवण्यापूर्वी दोषींचे आरोग्य पूर्णपणे सामान्य असणे आवश्यक आहे. दोषी हा शारीरिक, तसेच मानसिकदृष्ट्या उत्तम असला पाहिजे. फाशीवर चढवण्यापूर्वी दोषीने संपूर्ण प्रक्रियेचा सामना केला पाहिजे हा त्यामागील उद्देश आहे. दोषीचे आरोग्य ठीक नसल्यास त्याला फाशीवर चढवण्यात येत नाही. फाशीवर चढवण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर त्यांना त्यांनी केलेला गुन्हा आणि शिक्षा याबाबतीत दोषींना वाचून सर्व माहिती दिली जाते. आपण काय केले आहे याची त्याला जाणीव व्हावी, हा या मागचा हेतू असतो.