मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोणतीही खात्री न करता महा शिव आघाडी सत्तेवर येणार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राज्यपालांना अशा विविध बातम्या विविध चॅनेलने चालविल्या़ मालाडच्या हॉटेलमधील शिवसेनेच्या आमदारांना एकमेकांना पेढे भरवित असतानाचे चॅनेलच्या प्रतिनिधींनी लाईव्ह केले. चॅनेलच्या न्युजवर भरविसा ठेवून या आमदारांनीही आपला मुख्यमंत्री होणार असे वाटून आनंद व्यक्त केला.
युवा नेते आदित्य ठाकरे व विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे जात असल्याचे समजल्यावर ते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जात असल्याचा समज करुन पत्रकारांनी बातम्या दिल्या. शिवसेनेच्या आमदारांनाही नेमके काय होतेय याची खात्री न करता उद्धव ठाकरे या मुख्यमंत्री व्हावेत, अशा प्रतिक्रिया दिल्या.
राज्यभरात न्यूज चॅनेलवर लक्ष ठेवून असलेल्या सर्वच नागरिकांना आता शिवसेनेचे सरकार येणार असे वाटले. राज्यभरातील शिवसैनिकांनी तर जल्लोष करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी फटाके वाजविण्यात आले. काही जणांनी महाआरती केली़ तर काही ठिकाणी पेढे वाटण्यात आले.
त्यानंतर काही वेळाने आदित्य ठाकरे यांनी आपण सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र, त्यासाठी राज्यपालांकडे आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केल्याचे स्पष्ट केले. तेव्हा शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंब्याचे पत्रच अजून दिले नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची विनंती नाकारली असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्यावर तर जल्लोष करीत असलेल्या राज्यभरातील शिवसैनिकांना धक्का बसला आहे.
चॅनेलच्या प्रतिनिधींनी कोणतीही खात्री न करता कोणी तरी सांगितल्यावर विश्वास ठेवून सर्वात अगोदर बातमी देण्याच्या घाईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याच्या बातम्या पसरविल्या़ त्यातून राज्यभरातील शिवसैनिकांची गोची मात्र झाली आहे.