मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महाराष्ट्र असो किंवा उत्तरप्रदेश,शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी ‘बिग बी ‘ नेहमीच पुढाकार घेऊन मदतीचा हात देत असतात ;पण अमिताभ बच्चन यांना एक वचन अजून पूर्ण करायचे आहे, ते म्हणजे पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे ! स्वतः ‘बिग बी’ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यावर भाष्य केले आहे आणि हे वचन अजून पूर्ण करायचे आहे, असे ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, आणखी एक वचन पूर्ण केले आहे. बिहारमधील ज्या शेतकऱ्यांवर कर्जाचा भार होता, त्या 2100 शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यात आले आहे आणि वन टाईम सेटलमेंटद्वारे याची रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. यातील काही लोकांना बंगल्यावर बोलावले आणि अभिषेक-श्वेताच्या हस्ते त्यांना कर्ज फेडल्याचे पत्रक देण्यात आले. बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबीयांचा उल्लेख केला आहे. अजून एक वचन पूर्ण करायचे आहे. पुलवामा हल्ल्यात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पत्नीला मदत करायची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील ३५० शेतकऱ्यांचा सातबारा अमिताभ बच्चन यांनी कोरा केला होता.