वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – देशात अनेक जाती धर्म संघटीत असल्याने त्यांच्या मतांच्या भरवशावर अनेकांनी सत्ता उपभोगली. त्यामुळे हिंदू धर्म संकटात सापडला असून ‘हिंदू व्होट बँके’शिवाय धर्मरक्षण अशक्य असल्याचे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा देवी यांनी केले. हिंदू युवा वाहिनीच्या पुढाकाराने वाशिम येथे आयोजीत विराट हिंदू सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले प्रभु श्रीराम यांच्या जन्मस्थळी भव्य मंदिर उभारण्यासाठीचा लढा निरंतर सुरु ठेवण्यासाठी मंदिर निर्माणाचा संकल्प व गोहत्या बंदी प्रचारार्थ निरंकारी भवनच्या बाजूला खुल्या मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या विराट हिंदू सभेला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील प.पु. आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, वासुदेव आश्रमचे विजयकाका पोफळी महाराज, प.पू.बालयोगी गोपालनाथ महाराज रतनगड, प.पू. शंकरनाथ महाराज, महंत बाबुसिंग महाराज पोहरादेवी, योगी शाम भारती महाराज माहुरगड यांचे प्रतिनिधी स्वामी महाराज, महंत शांतीपुरी महाराज येवता व ह.भ.प. नारायण महाराज शिंदे खर्ची पुसद, विश्व हिंदू परिषदेचे अजय निंदावार, गोविंद शेंडे आदि संत महंतांची उपस्थिती होती. पुढे बोलताना साध्वी ऋतंभरा यांनी प्रभू श्रीराम मंदिर निर्माणासाठी कारसेवकांनी विवादित वास्तू उध्दस्त केल्याची जबाबदारी तत्कालिन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी स्विकारली.त्यानंतर केंद्र सरकारने ताब्यात घेतलेल्या मंदिर संस्थानच्या जागेचा तिढा सर्वोच्च न्यायालयात गेला. झेंडा, डंडा व अजेंंडाच्या मुद्यावर हिंदू विघटीत झाल्याने मंदिर निर्माण रखडले.परंतू अनेक वर्षांनंतर धर्माभिमान व देशभक्ती जागृत असलेले व्यक्तीमत्व प्रधानमंत्री पदावर आरुढ झाल्याने विवादित जमिन न्यायालयाकडे परत मागण्यात आली.त्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण व मंदिर निर्माणासाठी हिंदू व्होट बँक गरजेची असल्याचे त्या म्हणाल्या. या सभेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित चव्हाण, संयोजक अमित मानकर, गजानन जाधव व हिंदू युवा वाहिनीचे योगेश रंगभाळ आदिंनी परिश्रम घेतले. या सभेचा समारोप हजारो श्रीराम भक्तांनी केलेल्या प्रभू श्रीरामाचा जयघोषाने करण्यात आला.