मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – “राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?”, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. ताईचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण? असा खोचक टोमणा चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात हायकोर्टानं आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ( Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation) त्यानंतर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
तसेच, अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… असे टोलाही चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लगावला आहे. राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केलेल्या या दोन्ही महिला नेत्या, राजकारणात आता सातत्याने एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत.
Home Minister of Maharshtra @AnilDeshmukhNCP Finally Resigns !
Now the question arises that who will be the New Vasooli Minister??
Change of face won't change the Corrupt intentions of the MVA Government.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra#AnilDesmukh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 5, 2021
“हायकोर्टानं दिलेल्या निकालानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. उशिरा का होईना त्यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडीचं हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार नाही. हे आता सव्वा वर्षानंतर राज्यातील जनताच अनुभवत आहे. यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासण्याचं काम केलं आहे”, असा जोरदार घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.