अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – कर्जत जामखेड मतदार संघात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या रोहित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला कधीही हार मानायची नाही. कितीही मोठं आव्हान समोर असलं तरी झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करा, लोकांशी खोटं बोलू नका. लोकांच प्रामाणिकपणे काम केलं तर जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता” असे रोहित यांनी सांगितले होते. संगमनेर येथे आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात केवळ रोहित पवारच नाही तर या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सूत्रसंचालन तसेच मुलाखतकारचे काम पाहिले.
यावेळी इतर मतदार संघ सोडून कर्जत जामखेडचं का निवडले असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा रोहित पवार म्हणाले, ‘ कर्जत-जामखडेमध्ये तीस वर्षापासून विकास नव्हता. त्यामुळे त्या मतदारसंघात विकास करण्याची संधी होती. तसेच कर्जत-जामखेडला मी विकासाचे मॉडेल तयार करायचे ठरविले होते.
… अन वडिलांच्या डोळ्यात पाणी आले
यावेळी एक भावनिक प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. जेव्हा तुम्ही निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं असे विचारल्यानंतर रोहित म्हणले , मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
कर्जत जामखेड सारख्या मतदार संघात रोहित पवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. या निमित्ताने पवारांची तिसरी पिढी मैदानात उतरली होती. जिंकून आल्यानंतर देखील त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राम शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती आणि त्यांच्या आईंचा आशीर्वाद देखील घेतला होता. याची सुद्धा मोठी चर्चा त्यावेळी रंगली होती.