मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आयात केलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदभार स्वीकाररताच मुंबई शहरातील म्हाडाच्या इमारती शहराबाहेर बांधण्याचे आदेश दिले. यावरून विखे पाटील यांनी मुंबईकरांच्या अस्तित्वालाच सुरुंग लावल्याची टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली.
विखेंनी दिलेल्या निर्णयाविरोधात घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुंबई शहरातुन मराठी माणसाला शहराबाहेर ढकलण्याचा डाव भाजप सरकार करत असल्याची टीका मातेले यांनी यावेळी उपस्थित केली. मुंबई शहरापासून ५० किलोमीटर लांब म्हाडाच्या इमारती बांधण्याची व्यवस्था करावी, असे आदेश विखे यांनी काढले. हे सर्व मराठी माणसाच्या खिशाला परवडणारे नाही. विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेता असताना केवळ साटं-लोटं करण्याचं काम केले. अशा नेत्याने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो असे मातेले म्हणाले. मुंबई शहरात मराठी माणसाच्या हितासाठी म्हाडा ही शासकीय संस्था उभारण्यात आली. मराठी माणसावर जर त्याला शहराबाहेर काढून अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही असा इशारा मातेले यांनी दिला.
राष्ट्रवादी विद्यार्थीने पुकारलेल्या आंदोलनाला अल्पसंख्याक विभागाचे मुंबई शहर अध्यक्ष सोहेल सुभेदार, घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव व तालुका कार्याध्यक्ष अन्वर दळवी यांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.