मुंबई बहुजननामा ऑनलाईन – भाजपने गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे भगदाड पाडत विविध नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांकडून काढल्या जाणाऱ्या महाजनादेश यात्रेला शिवस्वराज्य यात्रेने प्रत्युत्तर देणार आहे. विशेष म्हणजे या यात्रेचे नेतृत्व खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे करणार आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ही यात्रा सफल होईल अशी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.
राज्यातील पाच वर्षांच्या राज्य शासनाच्या पाच वर्षांचा लेखा जोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजानदेश यात्रा काढली आहे. या यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. ही यात्रा ४ हजार ३८४ किमीचा प्रवास करून ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे समाप्त होणार आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपने मोठे हादरे दिले आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक खंदे नेते भाजपमध्ये दाखल झाले. मात्र या आव्हानाला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनीती आखली गेली आहे. राष्ट्रवादीकडून ही यात्रा ६ ऑगस्ट रोजी शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथून सुरु होणार असून जिजामाता यांचे जन्मगाव सिंदखेड राजा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादीकडून ही यात्रा सुरु करण्यात येणार आहे. या यात्रेने भाजपला आव्हान निर्माण करण्याचा राष्ट्रवादी क़ॉंग्रेसचा प्रयत्न आहे.