मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे काही आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. एका वृत्तसंस्थेशी बोलतांना जयंत पाटील यांनी भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीकडून भाजपला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. पाटील यांनी भाजपचे १५ ते २० आमदार संपर्कात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. निवडणुकीआधी अनेक आमदार, नेते भाजपमध्ये गेले. ते आता आमच्याशी संपर्क साधत असल्याचा खुलासाही राष्ट्रवादीच्या नेत्याने केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांत त्यांच्याकडून अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडून चूक झाल्याचे सांगत आहेत. खासगीत सगळेच कबूल करत आहेत. अशा आमदारांना परत यायचे झाले तर त्याठिकाणच्या निष्ठावंतांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल. कोणतेही प्रकल्प थांबणार नाहीत, भाजपकडून जो गैरसमज पसरविण्यात येत आहे तसे काही होणार नाही.
आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रकल्प करू. भाजपकडे १०५ जागा आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे काही गोळा केल्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे. आम्हाला पाच वर्षे सरकार टिकवायचे आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, असे पाटील यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com