मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकत्याच भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले यांनी पक्ष सोडताना राष्ट्रवादीवर अनेक गंभीर केले होते. यात पक्षातील काही नेत्यांचाही समावेश होता. राष्ट्रवादी सत्तेत असताना फक्त आडवा आणि जिरवा हेच धोरण होतं असा आरोप उदयनराजेंनी केली होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आरोपांना प्रत्यु्त्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले, “उदयनराजेंनी पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. सकाळी माझ्या घरी बैठक झाली. यात विधानसभा निवडणूक आणि त्यात उदयनराजेंची जबाबदारी, पक्षाची आगामी रणनीती आखली गेली होती. परंतु उदयनराजेंनी दुपारनंतर आपला निर्णय बदलला.” पुढे पवार म्हणाले की, “आम्ही सत्तेत असताना उदयनराजेंची कोणती कामे रोखली, असं माझ्या पाहण्यात नाही. त्यांची काही खासगी कामं रोखली असतील तर मला माहीत नाही. परंतु मी त्याविषयी आता भाष्य केलं तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील.”
तु्म्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का ? असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले, “या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजिबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येत.” असं त्यांनी सांगितलं.