मुंबई : बहुजनामा ऑनलाईन – ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’ या वाक्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तत्कालीन फडणीवस सरकारला खरमरीत टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले कि, ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’ असा धडा बदलणाऱ्यांना मला सांगायचयं की, माझ्यावर लहानपणापासून कमळ बघण्याचे संस्कार झालेले नाहीत. माझा जन्म झाला त्यावेळी सात दिवसांचा असताना आईच्या काखोटीतून स्कूल बोर्डाच्या मीटिंगला गेलो आहे. त्यामुळे मला कमळ कसं दिसेल?”. शनिवारी शिक्षक परिषदेचा मुंबई विभाग आणि शिक्षक भारती या संघटनांची अधिवेशने पार पडली.
दरम्यान, हे अधिवेशन गाजले ते राजकीय टोलेबाजी आणि शिक्षण विभागाच्या धोरणांवरील टीकेने. या अधिवेशनात उपस्थित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी आधीच्या शासनाच्या निर्णयांचा चांगलाच समाचार घेतला, तर परिषदेच्या अधिवेशनात माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महापालिकेच्या शाळा सीबीएसई, आयसीएसई मंडळाशी संलग्न करण्याच्या निर्णयावर टीका केली.
शरद पवार पुढे म्हणाले कि, “शाळा बंद करण्याचा निर्णय हा असंवेदनशील होता. शाळा सुरू करण्याच्या परवानगी वेळी हा विचार केला पाहिजे. त्या सुरू केल्यानंतर त्यांना अनुदान न देणे योग्य नाही. शिक्षकांचे प्रश्न खूप आहेत, ते लगेच सोडवता येतील असे नाही. मात्र काही महत्त्वाचे मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्याबाबत शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात येईल,”
संजय राऊत म्हणाले कि, “महाराष्ट्रात शिक्षणाची मोठी परंपरा असल्याने शिक्षणाची घडी नीट बसवणे आवश्यक आहे. शिक्षक गुलाम नाहीत, मात्र मागील पाच वर्षांपासून त्यांना राजकीय सेवकासारखा वागवण्याचा प्रयत्न केला गेला. तुमच्या मागण्यांचे मंत्रालयाबाहेर फलक लावा म्हणजे मुख्यमंत्र्यांना या मागण्या किती गंभीर आहेत ते कळेल. शिक्षकांच्या वेदना ते समजून घेतील आणि पुढच्या अधिवेशनाला फलक लावण्याची वेळ येणार नाही”.
‘..आम्ही धडा शिकवला’
राजकीय टोलेबाजी करत संजय राऊत म्हंटले कि, ‘तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी गेली पाच वर्षे जसा संघर्ष करत होतात तसाच आम्ही सत्तेत राहून करत होतो. पाच वर्षांत इतिहास बदलला, धडे बदलण्यात आले. मग आम्ही काय केले तर सरकारच बदलले. धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले’. तर ‘प्रश्न सोडवण्यासाठी काही बदल करण्याची आवश्यकता होती असे लक्षात आले. अमुक धडय़ात हे आहे असे सतत समजावूनही उपयोग होत नसेल तर अखेर ‘धडा’ द्यावा लागतो किंवा धडा शिकवावा लागतो. पण धडा एकटय़ाने शिकवता येत नाही. म्हणून मग आमची नजर संजय राऊत यांच्याकडे गेली,’ अशी टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.