बहुजननामा ऑनलाईन – मी अनेक बरी वाईट कामे केली पण कधी तुरुंगात गेलो नाही. असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे अमित शहा यांना नाशिकच्या दौऱ्यावेळी लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीची गळती काही केल्या थांबायच नाव घेत नाही. त्यातच अनेक बड्या नेत्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीतून काढता पाय घेत भाजप शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनीच राज्यभर दौरा करुन ही गळती थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान त्यांचा दौरा नाशिकला पोहचला. नाशिकच्या दौऱ्यात विरोधकांवर टोलेबाजी करत त्यांनी भाजपचे अमित शहा यांच्यावर या शब्दात घणाघाती टिका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी शरद पवारांनी आजवर काय केलं अशी टीका काही दिवसांपुर्वी केली होती. यावर शरद पवार यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये. मी आजवर अनेक बरं-वाईट कामं केली पण कधी तुरुंगात गेलो नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातूनच झाली. १९६५ साली राज्यातील तरुणांचं नेतृत्त्व माझ्याकडं होतं.
तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात. असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. सोलापुरात आल्यानंतर शरद पवार यांनी चार हुतात्म्यांना अभिवादन करुन रॅलीत सहभागी झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं.