बीड : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी संतापला आहे. त्यांचा संयम सुटला तर महाजनादेश यात्रा सोडून रस्त्यावर पळावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. माजलगाव येथील शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा काढू नका. जनता आणि शेतकरी संतप्त आहे. त्यांचा संयम सुटला तर महाजनादेश यात्रा सोडून रस्त्यावर पळावे लागेल. ही परिस्थिती शेतकरी तुमच्यावर आणेल.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री पोलिसांच्या बळाचा वापर करत आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत त्याठिकाणच्या लोकांना स्थानबद्ध करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच धुळ्यात धर्मा पाटील यांच्या 69 वर्षीय पत्नीला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती ?” असा सवाल त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज (रविवार दि 25 ऑगस्ट) माजलगावमध्ये आली होती. यावेळी तरुणांनी गर्दी केली होती. यावेळी स्टेजजवळ जाण्यास पोलिसांनी तरुणांना मज्जाव केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी पोलिसांना सुनावले.