नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकित वर्तवणा-या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी रविवारी (दि. 27) नाशिकमध्ये जोरदार उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारला 5 वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही, असा टोला पवार यांनी लगावला आहे.
नाशिकमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आ. पवार आले होते. नाशिक जिल्ह्याचे पवार साहेबांवर विशेष प्रेम असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, असे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर आणि भाजपच्या सोशल मीडिया टीमवरही त्यांनी निशाणा साधला. विरोधक हे केवळ विरोध करण्याचे काम करत आहेत. विरोधकांच्या सोशल मीडिया टीमला आर्थिक बळ आहे. विरोधकांकडून छोटे-छोटे विषय लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बिंबवले जात आहेत. भाजपच्या सोशल मीडियाला तितक्याच ताकदीने उत्तर द्यायला हवे, असेही पवार म्हणाले. राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा केंद्र सरकार देत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने कर्जमाफीतही राज्याला आणि शेतकऱ्यांना फसवले, असा आरोपही त्यांनी केला.
‘राज्यपालांची प्रतिमा जनतेच्या मनात वेगळी’
राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यास राज्यपालांकडून विलंब होत आहे. राज्यपालांची प्रतिमा ही जनतेच्या मनात वेगळी असते, परंतु, यामुळे या पदाबद्दल आता लोकांच्या मनात वेगळी भावना निर्माण होऊ लागली आहे, असे रोहित पवार म्हणाले. ईडीविषयीही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी या संस्थेची वेगळी विश्वासार्हता आणि प्रतिमा आहे. मात्र, सध्या ईडीच्या कार्यवाहीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे लोकांना वाटणे हे या संस्थेच्या बाबतीत योग्य नाही, असेही ते म्हणाले.