जालना : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना NIA कडून अटक केल्यानंतर गृहखात्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रीपद काढून घेण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नाव गृहमंत्रीपदासाठी चर्चेत आले आहे. मात्र स्वत: राजेश टोपे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राजेश टोपे यांनी या संदर्भात बोलताना ‘राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नाही,’ असा खुलासा केला आहे.
राजेश टोपे यांचं नाव का आहे चर्चेत ?
सचिन वाझे प्रकरण गृहमंत्रालयाला योग्य पद्दतीने हाताळता न आल्याने गृहखात्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी शरद पवारांकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याच्या अगोदर या गृहमंत्रीपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत होती पण सध्या गृहमंत्रीपदासाठी राजेश टोपे यांच्या नावाचा विचार करण्यात येत आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळात राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी आहे. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे राज्यभरातून कौतुक करण्यात आले होते. यामुळे गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचा विचार राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. पण राजेश टोपे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात आहेत. त्यामुळे पुढील काळात नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत त्या पाहणे महत्वाचे ठरणार आहे.