नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, ‘मी पुन्हा येईन’ असे सांगत मुख्यमंत्री पदावर बसण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आता त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकेच माझ्या डोक्यात आहे, असे शरद पवार यांनी नागपूर येथे बोलताना म्हटले आहे.
मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसून हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शरद पवार कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्रीपदाची मागणी असेल तर विचार करावा लागेल. राज्यात स्थिर सरकार यावं, अशी इच्छा आहे, असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी विदर्भात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली.
पवार यांनी विदर्भात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. विदर्भात अवकाळी पावसामुळे ४४ हजार २१३ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी महत्त्वाची असे म्हणत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व्हेतील आकडेवारी सादर केली. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बांधावर जाऊन पाहिलं तर महत्त्वाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल, असं त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
Visit : bahujannama.com