मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकताच उदयनराजे भोसले यांनी सातारच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचा पक्षत्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिव्हारी लागल्यानंतर आता त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी सोडलेल्या अनेक नेत्यांवर पवारांनी टीका केली.
शरद पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वत: हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.”
पुढे पवार म्हणाले, “महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवीन रयतेचे राज्य निर्माण केले. कुण्याच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातींच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र आपण घडवू या. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री पाच वर्षांमध्ये आपण काय केले हे न सांगता केवळ विरोधकांची निंदा नालस्ती करण्यातच धन्यता मानत आहेत.” अशी टीकाही त्यांनी केली.