बहुजननामा ऑनलाईन टीम : देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात करावी. जेणेकरून जनतेच्या मनातील भीती निघून जाईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तसेच सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती. परंतु त्यानंतर देशात या लसीकरणावरून राजकारणास सुरूवात झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनीच लस घेऊन लसीकरणाला सुरुवात करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा खर्च राज्यांना उचलावा लागणार नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादादरम्यान स्पष्ट केले आहे.