नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – ‘संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजपा कौतुक कसे करणार? सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरु ठेवाव्या लागतात. संख्या १०५ असल्याने विरोधकांचा असा प्रयत्न सुरु आहे.’ असे मत व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे. वैतरणेच पाणी मुकणेमध्ये सोडण्याच्या अनुषंगाने पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी म्हटलं की, “काँग्रेसवर अन्याय होता कामा नये. मुख्यमंत्री काँग्रेसशी चर्चा करत असून, काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही सर्वजण काल एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं” पाटील म्हणाले.
राम मंदिरावर केलं भाष्य
धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे पण धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीच्या बाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील,’ असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच पुढं बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना संसर्गामुळे लोकांच्या लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदार संघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं. राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नसेल, मात्र कोरोना संसर्गाच्या संकटात या महामारीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादित ठेवण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.’
तर नाशिकच्या पाणीप्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, ‘शेतकऱ्यांना भेटून चर्चा केली जाईल. बाहुली धरणाच्या आसपास पर्यटनास चांगली संधी उपलब्ध आहे. जलसिंचन विभागाकडील काही जागांचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो. सध्या सरकारकडे पैसे नाही, पण खासगी उद्योजकांनी यासाठी पुढे यावं’ असे आवाहन पाटील यांनी बोलताना केलं आहे.